Thursday 9 March 2017

प्रतिभावंत कलाकार.. मकरंद अनासपुरे

                 देहबोली,भाषाशैली आणि त्यांच्या विनोदी संवादांनी मराठी चित्रपटसृष्टीवर मराठीचा ठसा उमटविणारे चतुरस्त कलाकार म्हणजेच मकरंद अनासपुरे. सुपरस्टार मकरंद अनासपुरे यांचा जन्म औरंगाबाद येथे २२ जुलै १९७३ रोजी झाला अभ्यासात हुशार असलेल्या मकरंद अनासपुरे यांनी पहिल्यांदा नाटकात काम केलं ते चौथी मध्ये असताना,त्यावेळेस पारितोषिक मिळालं एक पेन्सिल आणि खोडरबर आणि ह्या मिळालेल्या पारितोषिकाने त्यांचं नातं अभिनयही कायमचं जोडलं.. लहानपणापासून त्यांना डॉक्टर व्हायची खूप इच्छा होती परंतु काही कारणांमुळे प्रवेश मिळाला नाही मग त्यांनी BSC करायचे ठरवले. बालपणी नाना पाटेकरांच्या अंकुश हा सिनेमा त्यांनी २६ वेळा पहिला आणि नानांच्या अभिनयाची छाप यांच्यावर एवढी पडली कि त्यांनी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवायचे निश्चित केले. यासाठी ते बीड मधून औरंगाबाद मध्ये आले . 
                  अभ्यासासोबतच एकांकिका मध्ये काम करणं हि सुरु होतं.. त्यांनी तेव्हा अनेक पारितोषिक हि मिळवली. त्या दिवसात त्यांची मैत्री जडली ती अभिनेता मंगेश देसाई यांच्याशी. आणि ह्याच मित्राच्या हट्टापायी त्यांनी कलादर्पण ह्या स्पर्धेत भाग घेऊन अनेक फेऱ्यांमध्ये विजेतेपद मिळवले आणि अंतिंफेरीसाठी समूहासह मुंबईमध्ये आले. ह्या स्पर्धेचे प्रमुख पाहुणे होते नाना पाटेकर.. त्यांना मकरंद अनासपुरे ह्यांचा अभिनय इतका आवडला कि त्यांनी ''तू मुंबईला नक्की ये मी तुला मदत करेन''ह्या वाक्यात त्यांचं कौतुक केलं. आणि कलादर्पण ह्या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचं प्रथम पारितोषक देखील मकरंद अनासपुरे याना भेटलं. नंतर त्यांनी नाट्यशात्र विभागातून पदवी संपादन केली. हे सगळं सुरु असताना चित्रपटसृष्टीत प्रवेश मिळवण्यासाठी एकांकिकेचे दिग्दर्शनहि केले. यासाठी त्यांची फार धडपड करण्याची तयारी होती. 

                 सुरुवातीला मिळतील त्या भूमिका साकारणाऱ्या मकरंद अनासपुरे यांनी मुंबई गाठली. जवळपास ५०० हुन अधिक पथनाट्य करत असताना गावागावांमध्ये जाऊन तिथल्या लोकांशी संवाद साधून त्यांच्याकडून पथनाट्यासाठी लागणारे सांगितल्या गोळा करत त्यांची भाषा देखील हेरली. तिथलं वैविध्य जाणलं आणि नेमकं तेच प्रेक्षकांना आवडलं. मुंबईत ५०० रुपये घेऊन आलेल्या मकरंद अनासपुरे यांच्याकडे राहण्याची व्यवस्था नव्हती त्यामुळे त्यांनी सुवातीचा काळ आमदार निवासात राहून काढला. तब्बल ४ महिन्यांनी त्यांना त्यांचं पाहिलं नाटक भेटलं आणि हि संधी मिळाली ती केदार शिंदे यांच्यामुळे ''झालं एकदाचं'' या नाटकात त्यांची ७ मिनिटांची भूमिका होती आणि त्याचीच पत्रकारांनी दखल घेतली आणि त्यांनी साकारलेल्या भूमिकेचं हि खूप कौतुक केलं. वामन केंद्रे आणि चेतन दातार यांच्या साहाय्याने कित्येक वेळा फुकट नाटक बघून दिवस काढले. छोट्या मोठ्या मालिकांमधून ते वेगवेगळ्या भूमिका साकारत होते,''सुनं सुनं आभाळ'' हि त्यांची दूरदर्शन वरील मालिका प्रचंड गाजली त्यात त्यांनी खलनायकाची भूमिका साकारली होती. एकीकडे स्वतःचा स्ट्रगल सुरु असताना नाना पाटेकरांनी मकरंद अनासपुरे यांना फार मदत केली. ''यशवंत''या सिनेमासाठी अभिनेता म्हणूनच नव्हे तर सहाय्यक अभिनेत्याची भूमिका त्यांच्या खांद्यावर सोपवली. याव्यतिरिक्त वजुद,जय सूर्य,यांसारख्या चित्रपटांसाठी मकरंद अनासपुरे यांचं नाव सुचवलं. टीव्ही मध्ये बेधुंद मनाच्या लहरी हि मालिका जितकी गाजली त्याचप्रमाणे नाट्यसृष्टीमध्ये टूर-टूर,जाऊ बाई जोरात,टिकलं ते पोलिटिकल या नाटकांमुळे प्रस्थापित अभिनेता म्हणून नावारूपाला आले. एका प्रयोगा दरम्यान त्यांची भेट झाली शिल्पा ह्या मुलीशी ह्याच मुलीसोबत पुढे त्यांनी विवाहसुद्धा केला. या जोडप्याला एक मुलगी सुद्धा आहे पण हिरो होणं अजून देखील बाकी होतं. हिंदी मध्ये वास्तव,प्राण जाये पर शान ना जाये हे सिनेमे त्यांनी केले. मराठी मधला सरकारनामा हा त्यांच्या पहिला चित्रपट,आणि त्यामधील त्यांच्या भूमिकेची सर्वानीच दखल घेतली मग त्यांनी मागे वळून कधी पाहिलंच नाही. एकामागोमाग एक सुपरहिट चित्रपट देणाऱ्या या सुपरस्टारचे कायद्याचे बोला, सातच्या आत घरात ते चित्रपट प्रचंड गाजले आणि मकरंद अनासपुरे ह्यांची मागणी वाढू लागली. त्यांच्या देहबोली मुळे ग्रामीण भागातील त्यांचे बरेच चाहते वाढले आणि त्यांनी तसेच ढीगभर सिनेमे केले. गाढवाचं लग्न,जाऊ तिथे खाऊ,नाना मामा, सडे माडे ३,दे धक्का,मी शिवाजी राजे भोसले बोलतोय या चित्रपटातील त्यांची रायबा ची भूमिका खूपच वेगळी होती. गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा,निशाणी दावा अंगठा,सुम्बरान,खुर्ची सम्राट ह्यांसारख्या चित्रपट देऊन ते विनोद रसिकांना निखळ हसवत होते. तसेच लोकप्रियता त्यांनी एकाहून एक चित्रपट देऊन मिळवली. त्यानंतर त्यांनी दिग्दर्शन क्षेत्रातही पाऊल ठेवलं डॅम्बीस या चित्रपटाचे त्यांनी दिग्दर्शन केले आणि गोष्ट छोटी डोंगराएवढी आणि गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा या चित्रपटासाठी ते सहनिर्माते म्हणून कार्यरत होते. 
                हजरजबाबीपणा आणि अभिनयाची उत्तम जाण असलेल्या मकरंद अनासपुरे यांनी सामाजिक भान जपत नाना पाटेकरांसोबत नाम फाउंडेशन ची स्थापना केली. महाराष्ट्रातील दुष्काळ ग्रस्त शेतकऱ्यांना मदत देऊ केली. आणि खऱ्या अर्थाने ते शेतकऱ्यांच्या नजरेत नायक झाले. त्यांचं व्यक्तिमत्व जितकं साधं तितकं बोलकं हि आहे त्यांच्या भाषाशैलीच्या अंदाजाने त्यांनी रसिकप्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करून महाराष्ट्र प्रचंड हसवलं. त्यांच्या ह्या कारकिर्दीला majja.ooo तर्फे खूप शुभेच्छा. 







majja.ooo : Ankita Lokhande.

No comments:

Post a Comment